मनसे नेते संदीप देशपांडे यांनी समाजमाध्यमावर केलेल्या सूचक पोस्टमुळे ठाकरे बंधूंच्या एकीत मिठाचा खडा पडला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही नेत्यांनी हातमिळवणी केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, निवडणुका पार पडताच मनसे आणि ठाकरे गटातील मतभेद चव्हाट्यावर येताना दिसून येत आहे. मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या तीन जागांवरून दोन्ही पक्षात वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमुळे या चर्चांना आणखीनच बळकटी मिळाली आहे. कोत्या मनाच्या प्रवृतींकडून स्वीकृतीची अपेक्षा ठेवू नये, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांचा हा रोख ठाकरे गटाकडेच असल्याचे दिसून येत आहे.
भाजपाच्या धक्कातंत्राची चर्चा
राज्यसभेच्या निवडणुकीत चार जागांवर उमेदवार देताना भारतीय जनता पक्षाकडून धक्कातंत्राचा वापर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यसभेच्या सात जागांसाठी राज्यात लवकरच निवडणूक होणार आहे. तशी घोषणाही राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीला सहा तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा येण्याची शक्यता आहे. त्यातच महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाच्या वाट्याला राज्यसभेच्या चार जागा येणार आहेत. या चार जागांसाठी भाजपाकडून धक्कातंत्र वापरले जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. माजी मंत्री विनोद तावडे यांच्यासह आणखी तीन दिग्गज नेत्यांची नावे राज्यसभेच्या शर्यतीत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे भाजपा ऐनवेळी धक्कातंत्राचा काय वापर करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Post a Comment